मासिक

परिचय

अभिप्राय

'अंतर्नाद' म्हणजे...... समृद्ध साहित्यसृष्टी वाचकांना सुसंस्कृत करू पहाणारी सकारात्मक जीवनदृष्टी ... सांस्कृतिक समृद्धीची नाममुद्रा … मराठी संस्कृतीकारणाचा मानबिंदू… सर्वस्पर्शी रसिकतेचा अनाहत नाद ... आधुनिक,सर्जनशील आणि सौंदर्योपासक समाजनिर्मितीचा निरंतर ध्यास... प्रतिभावान लेखकांच्या साधनेची अभिव्यक्ती... सकस मराठी साहित्याचा दुर्मिळ खजिना ... जणू सूपभर लाह्यात दडलेला एकच बत्तासा..

विवेक सावंत
विवेक सावंत
माजी व्यवस्थापकीय संचालक आणि सध्या चीफ मेंटॉर, एमकेसीएल (महाराष्ट्र ज्ञान महामंडळ मर्यादित)

महाराष्ट्राची वाचनसंस्कृती, अभिरुचीसंपन्नता आणि ज्ञान-विज्ञानासह बौद्धिक मनोरंजन यांत भर घालणारे अंतर्नाद हे मासिक त्याच्या क्षेत्रातले सर्वाधिक लोकप्रिय व सर्वश्रेष्ठ म्हणावे असे होते. वाचकांनी वाट पाहावी, समाजाने मार्गदर्शन शोधावे आणि ज्ञानाने रंजकतेची कास धरावी असा अंतर्नादचा पेहराव आणि अंतर्भाव होता. मासिक म्हणून आज ते काळाच्या पडद्याआड गेले असले तरी अंतर्नाद आणि त्याचे संपादक भानू काळे यांनी मराठीच्या सांस्कृतिक क्षेत्राला दिलेले योगदान कोणाच्याही विस्मरणात जाणार नाही. चांगल्या नियतकालिकांना वाईट दिवस येणे ही आपल्या सांस्कृतिक घसरणीची बाब आहे. लोकजीवन अधिक सुसंस्कृत करण्याच्या गरजेच्या काळातले हे विपरित आहे.

सुरेश द्वादशीवार
सुरेश द्वादशीवार
संपादक लोकमत आणि माजी अध्यक्ष, मराठी साहित्य महामंडळ, नागपूर

माझ्या साहित्यिक प्रवासात अंतर्नादचे स्थान अद्वितीय आहे. महाराष्ट्राच्या सांस्कृतिक जीवनातही या मासिकाचे महत्त्वपूर्ण योगदान आहे. विदेशात असतानासुद्धा मला भारताच्या विविध आयामांचे दर्शन घडवण्याचे काम अंतर्नादने केले आहे. स्थानिक, राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय असे तीनही धागे जुळवून मराठी माणसाची अभिरुची संपन्न करण्याची भूमिका निभावत असतानाच साहित्यिक अभिरुचीचे लोकशाहीकरण करण्यातही अंतर्नाद आघाडीवर राहिले आहे.

ज्ञानेश्वर मुळे
ज्ञानेश्वर मुळे
पूर्व राजदूत व सध्या सदस्य, राष्ट्रीय मानवाधिकार आयोग, दिल्ली

गेली अनेक वर्षे अंतर्नादने मराठी वाचकाच्या मनाची मशागत केली. त्याची संवेदनशीलता तरल केली. वाचकाला ३६० अंशांच्या त्रियामी कक्षेतून फिरवत त्याच्या साहित्यिक जाणिवेची क्षितिजे विस्तृत केली. अंतर्नादने कुठलाच विषय वर्ज्य मानला नाही. भाषेपेक्षा साहित्य आणि साहित्यापेक्षा जीवन श्रेष्ठ असते याचे भान अंतर्नादने ठेवले.

दत्ता दामोदर नायक
दत्ता दामोदर नायक
साहित्यिक आणि उद्योजक, मडगाव, गोवा

आमच्या जाणिवा समृद्ध करून, आमच्यातील उणिवा हळुवारपणे अधोरेखित करण्याचे काम अंतर्नादने पंचवीस वर्षे केले आहे. अनेक लेखकांना याचा फायदा होऊन त्यांचे लिखाण उजळून निघायचे. यास्मिन शेख यांच्यासारखा व्याकरण-सल्लागार असणारे अंतर्नाद हे बहुधा एकमेव मराठी मासिक असावे. भानूदा व वर्षाताई यांची सांस्कृतिक समृद्धीची कल्पना नुसते वैभवशाली गतकाळाचे स्मरणरंजन करीत राहणारी नव्हती; तर ती वर्तमानातील चांगुलपणा टिपत आशादायी भविष्यकाळाचा वेध घेणारी होती. चंगळवाद व तुच्छतावाद यावर हा उतारा आहे. हे करण्याचे दोन मार्ग भानुदांसमोर होते. लेखन व संपादन. त्यांनी हे दोन्ही मार्ग चोखाळले. पण हे करताना त्यांच्यातील संपादकाने लेखकावर थोडीफार मात केली.

डॉ. अनिल जोशी
डॉ. अनिल जोशी
पॅथोलॉजिस्ट, पंढरपूर

सांस्कृतिक अभिरुचीच्या विकासप्रक्रियेत नियतकालिकांचा मोठा वाटा असतो. या संदर्भातले अंतर्नादचे श्रेय नोंदवायला हवे. अंतर्नादचा कालखंड हा दोन शतकांचा संधिकाल होता. त्या कालखंडातील आव्हाने ओळखून संपादकांनी परंपरेतील सत्त्वांश वेचलेच, पण त्याचबरोबर बदलत्या भविष्याचा वेध घेणारे लेखनही सामावून घेतले. विविध सदरांची योजना, मुखपृष्ठ, मांडणी यांतून प्रगट झालेली संपादकीय दृष्टी कलात्मकतेची जपणूक करतानाच जीवनाभिमुखही राहिली. भाषा , साहित्य आणि इतर कला या घटकांच्या माध्यमातून सांस्कृतिक श्रीमंती कशी जपायची, याची जाणीव भानू काळे यांना होती. त्यामुळे अंतर्नादला स्वतःचा अमीट ठसा उमटवता आला, हे महत्त्वाचे आहे.

प्रा. डॉ. नीलिमा गुंडी
प्रा. डॉ. नीलिमा गुंडी
ज्येष्ठ साहित्यिक व समीक्षक, पुणे

मराठी माणसाचे काही खरे नाही. मानदंड ठरावीत अशी ज्योत्स्ना, अभिरुची, छंद, सत्यकथा, किर्लोस्कर, सोबत, माणूस अशी नियतकालिके तो उभी करतो, आणि मग बंदही करतो! महाराष्ट्रात मासिक चालवणे म्हणजे लाखाचे बारा हजार करणे. हे असे का होते? रसिकता कमी पडते की व्यवहार जमत नाही? पण मराठी माणसांचे खरेच काही खरे नाही. कारण हे असे होत असताना, हे असेच होणार हे समजत असताना एक मराठी माणूस मुंबईमधील आपला सुस्थितीत असलेला व्यवसाय बंद करतो, पुण्याला येतो, ‘प्रकाशाचे गाणे अवसेच्या रात्री’ असे म्हणत सांस्कृतिक समृद्धीसाठी म्हणून अंतर्नाद सुरू करतो. त्यानंतरच्या वाटचालीत अंतर्नादने इतिहास घडविला. साहित्यातील नवे-जुने हे वाद मानले नाहीत. राजकारणातील डावे-उजवे यांना सन्मानाने सारख्याच अंतरावर ठेवले. पुरोगामी-प्रतिगामी असेही काही मानले नाही. वाचकांना बदलत्या भारताचे दर्शन घडविले आणि नव्या जगाची सुरवात स्वत:पासून होते हे सहजपणे समजावून दिले. चटपटीत पण टाईमपास नव्हे, वैचारिक पण जांभई द्यावयास लावणारे नव्हे असे ललितचिंतनाचे एक प्रसन्न दालन साहित्यविश्वात अंतर्नादने प्रस्थापित केले.

डॉ. दत्तप्रसाद दाभोळकर
डॉ. दत्तप्रसाद दाभोळकर
शास्त्रज्ञ आणि शोधपत्रकार, सातारा

सुसंस्कृत समाजासाठी निकोप अभिरुचीची गरज असते. अभिरुचिसंपन्न वाङ्मयव्यवहार हे सुसंस्कृत समाजाचे लक्षण आहे. तशी अभिरुची विकसित करण्यासाठी काही लोकांना झोकून देऊन काम करावे लागते, त्याग करावा लागतो. असा त्याग भानू आणि वर्षा काळे यांनी केला. भानू काळे एक श्रेष्ठ प्रतीचे कादंबरीकार आहेत. परंतु त्यांनी स्वतःचे ललितलेखन बाजूला ठेवून मुक्त विचारांना वाहिलेले अंतर्नाद हे वाङ्मयीन नियतकालिक पंचवीस वर्षे चालवले आणि निकोप वाङ्मयीन संस्कृती निर्माण करण्याचा प्रयत्न केला. हे त्यांचे कार्य अत्यंत महत्त्वाचे आहे.

डॉ. नागनाथ कोत्तापल्ले
डॉ. नागनाथ कोत्तापल्ले
माजी कुलगुरू, डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ

संपर्क करा